क्षत्रियधुरन्धर: थोरले छत्रपती शाहू महाराज
इतिहासाच्या महापटावर काही नावे रक्ताच्या अक्षरांनी कोरली जातात, तर काही संघर्षाच्या निखाऱ्यांतून तासून निघतात. पण थोरले छत्रपती शाहू महाराज हे एक असे नाव आहे, ज्यांच्या नशिबी नियतीने अठरा वर्षांचा प्रदीर्घ वनवास लिहिला होता.
ज्या सह्याद्रीच्या पुत्राने औरंगजेबाच्या अथांग आणि विलासी लष्कराचे वैभव पिंजऱ्यातून पाहिले, ज्याने रक्ताचे नातेसंबंध स्वार्थाच्या दलदलीत रुतलेले पाहिले आणि ज्याने शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पडझड आपल्या तीक्ष्ण नजरेने टिपली, तोच पुत्र जेव्हा मुक्त होऊन स्वराज्याच्या भूमीत परतला, तेव्हा त्याच्या हातात केवळ तलवार नव्हती; तर त्याच्याकडे होता मोगली सत्तेचा मर्मवेध घेणारा अनुभव आणि मुत्सद्देगिरीची अभेद्य ढाल.
'क्षत्रियधुरन्धर' ही एका अशा छत्रपतींची कथा आहे, ज्यांनी मोगली गोटात राहून मोगली सत्तेच्या विनाशाचे आराखडे आखले.
हे पुस्तक म्हणजे एका वनवासातून सार्वभौम साम्राज्याकडे जाणाऱ्या प्रवासाचा मागोवा आहे. हा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे.